Tuesday, January 24, 2017

श्रीं क्षेत्र गाणगापुर

निर्गुण मठ (श्री दत्त मंदिर) :- श्रींची कर्मभूमी. श्रींच्या अनेक अतर्क्य लीलांनी पुनित झालेले हे तीर्थक्षेत्र. या मठात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत.




गाणगापूर दिव्य निर्गुण पादुका यांचे काय महात्म्य आहे ?

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले.पादुका विशेष -वाडीच्या पादुकांना ‘मनोहर पादुका’ म्हणतात, तर गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे.
येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही.या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

श्रींनी आपले अवतार कार्य संपवून गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह (श्रीसिद्धमुनी, श्री सायंदेव, श्री नंदीनाम व श्री नरहरीकवि) श्रीशैलकडे प्रस्थान केले.

“शिशिर ऋतु माघमासीं | असितपक्ष प्रतिपदेसी | शुक्रवारीं पुण्यदिवसीं | श्रीगुरु बैसले निजानंदी ||३७|| अ.५१”

“श्रीगुरु म्हणती शिष्यांसी | जातों आम्ही निज मठासी | पावतां खूण तुम्हांसी | प्रसादपुष्पें पाठवितों ||३८|| अ.५१”


श्री कल्लेश्वर मंदिर :-  गाणगापूर येथील कल्लेश्वर स्थान महात्म्य काय आहे?

श्री क्षेत्र गाणगापुरच्या पूर्वेला अष्टतीर्थांपैकी मन्मथ तीर्थाच्या जवळ असलेले हे श्री कल्लेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश, श्रीदुर्गापार्वती, नवग्रह आणि शमीवृक्षातून प्रकट झालेले शनैश्वर इ. देवतांची मंदिरे आहेत.

कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वरहे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहेगाणगापूर येथील संगम स्थानाचा काय महिमा आहे ?

श्रीगुरुचरित्रातल्या ४९ व्या अध्यायात या श्री कल्लेश्वराचे महत्त्व सांगितलेले आहे.

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७||”

संगमेश्वर :- 
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे.

या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शनअगोदर भाविक संगमावर स्नान करतात.
पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.गाणगापूर दर्शन -गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्नान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका दर्शन, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य भूमीचे दर्शन भाविकांना व्हावे.

श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात या पवित्र स्थानांतील तीर्थांचे महात्म्य सांगितले आहे. या ठिकाणी अमरजा व भीमा नदीचा संगम आहे. या संगमाच्या पश्चिमेला श्री संगमेश्वर (श्रीशंकराचे) मंदिर आहे. श्री येथे नित्य अनुष्ठानासाठी येत असत.

कल्पवृक्षातें पूजोनि | मग जावे शंकरभुवनीं | संगमेश्वर असे त्रिनयनी | पूजा करावी मनोभावें ||३९||
 जैसा पर्वती मल्लिकार्जुन | तैसा संगमीं रुद्र आपण || भक्तिपूर्वक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||


गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा काय महिमा 

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षा मध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगम स्नान करून औदुंबरास -११, २१, १०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचे दिव्य वरदान आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.




अष्टतीर्थ स्थाने

भूमीवर असंख्य पवित्र तीर्थस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर क्षेत्रीच का वास्तव्य केले याबाबत श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात सविस्तर उल्लेख असून येथील अष्टतीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. ती अष्टतीर्थें पुढीलप्रमाणे आहेत.

१. षट्कुळ तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील औदुंबरवृक्षासमोर असलेले हे षट्कुळ तीर्थ. हे प्रयाग तीर्थासमान आहे.

औदुंबर वृक्षाचा काय महिमा आहे ...?

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्याआहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्याससंगम स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान आहे.

या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.

२. श्री नरसिंह तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील कल्पवृक्षासमोर असलेले हे श्री नरसिंह तीर्थ.

३. भागीरथी तीर्थ

काशीप्रमाणेच येथे काही अंतरावर असलेल्या मणिकर्णिका कुंडातून निघालेले पाणी भीमा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशीसमान आहे.

४. पापविनाशी तीर्थ

“ऐसे प्रख्यात तीर्थ देखा | नाम पापविनाशी ऐका | जे करिती स्नान भक्तिपूर्वका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||

५. कोटीतीर्थ

“सोम-सूर्यग्रहाणासी | अथवा संक्रतिपर्वणीसी | अमापौर्णिमा प्रतिपदेसी | स्नान तेथें करावे ||८८||
सवत्सेसी धेनु देखा | सालंकृत करोनि ऐका | दान द्यावें व्दिजा निका | एकेक दान कोटिसरसे ||८९||

६. रुद्रपादतीर्थ

हे तीर्थस्थान गया तीर्थासारखे आहे. रुद्रपादाची पूजा केल्याने कोटी जन्मांची पापे जातात.

७. चक्रतीर्थ

येथे स्नान केल्याने पाप्याला ज्ञान होते व व्दारका तीर्थासारखे पुण्य मिळते येथे अस्थि चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचे मंदिर आहे.

८. मन्मथ तीर्थ

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७|| मन्मथ तीर्थीं स्नान करावे | क्ललेश्वरातें पूजावें | प्रजावृध्दी होय बरवें | अष्टैश्वर्यें पाविजे ||९८||”

विश्रांती कट्टा :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात एका शुद्र शेतकऱ्याच्या भक्तीने संतोष पावून श्रींनी त्याच्यावर कृपा केल्याबाबतची सविस्तर घटना सांगितली आहे.

नागेशी :-

श्रीगुरुचरित्राच्या १३ व १४ व्या अध्यायात श्रींच्या व ज्या सायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भेटीचा व श्रींनी यवनापासून त्याला दिलेल्या अभयाबाबतचा उल्लेख आलेला आहे तो ब्राह्मण श्रींनी दिलेल्या आश्वासनानुसार २५ वर्षांनंतर गाणगापुरात श्रींच्या दर्शनार्थ आला ते श्रींची सेवा करण्याच्या निर्धाराने. त्या भक्ताचे अंत:करण पाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीक्षा घेतली. त्याबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सविस्तर आलेली आहे. ती घटना ज्या स्थानी घडली ते स्थान म्हणजे नागेशी.

सती कट्टा :-

माहूरच्या एका धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला त्याच्या विवाहानंतर चार वर्षांनी क्षय व्याधी झाली. ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनार्थ गाणगापूरला येताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. (यासंबंधाने श्रीगुरुचरित्रात ३०, ३१ व ३२ सविस्तर वर्णन आलेले आहे.) धर्माचरणाप्रमाणे तिने सती जाण्याची ज्या स्थानी सर्व तयारी केली ती ही जागा.

कुमसी :-

श्रीगुरुचरित्राच्या २३ व २४ व्या अध्यायात कुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्या त्रिविक्रम भारती तपस्वीबाबतची घटना वर्णन केलेली आहे. श्रींनी कुमसी गांवी त्रिविक्रम भारतींना ज्या स्थानी विश्वरूप दर्शन दिले त्या स्थानाची छायाचित्रे सोबत दिलेली आहेत. हे स्थान गाणगापूरपासून ३७ कि.मी. अंतरावर भीमा नदी तटावर आहे.

हिप्परगी (मंदेवाल) :- श्गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील हे एक छोटेसे गांव आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले.

तंतुकेश्वर मंदिर :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात तंतुकाबाबतची (विणकर) घटना आली आहे. श्रींनी एका भक्त तंतुकाला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्ययात्रा घडविल्याबाबतची ही घटना आहे. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिराला पुढे तंतुकश्वराचे मंदिर असे नांव पडले.

गाणगापूरची गांव वेस :-

श्री नरसोबाच्या वाडीतील आपले १२ वर्षांचे वास्तव्य संपवून गाणगापूरला आले. प्रथमत: ते संगमावर राहिले. पण वांझ म्हशीला दुभती केल्याच्या चमत्कारामुळे ते प्रसिध्दीस आले. त्यामुळे गाणगापूरचा यवन राजा त्यांचा भक्त झाला. त्यानेच श्रींना आग्रह करून त्यांना वाजत गाजत ज्या वेशीतून गाणगापूर नगरांत आणले ती ही वेस. याबाबतचा उल्लेख श्रीगुरुचरित्राच्या २३ व्या अध्यायात आलेला आहे.

श्रींचे पुष्परूपाने पुनरागमन :-

या पंचक्रोशीत श्रीभक्तांमध्ये माघ कृष्ण चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

माघ कृष्ण प्रतिपदा (गुरुप्रतिपदा), शुक्रवार या पुण्य दिवशी श्रींनी गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह श्रीशैलकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रींनी दु:खित भक्तांना, लौकिकार्थाने येथून जात असलो तरी आपला नित्य वास गाणगापूरीच असेल आणि भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी त्याना माझे दर्शन घडेल, असे आश्वास दिले होते.
पाताळगंगेत पुष्पासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना आश्वासित केले की आपण निजानंदी पोहचल्याची खूण म्हणून चार शेवंतीची पुष्पें पाठवितो ती प्रसाद म्हणून स्वीकारावी त्यांची अखंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शेवंतीची चार फुलं गंगेतून वाहात आली. तो दिवस म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीचा होता.

आजच्या दिवशी श्रींच्या पुष्परूपी पुनरागमनाप्रित्यर्थ येथे दु.१२.३० वाजता श्रींचा पालखी सोहळा असतो. पंचक्रोशीतील हजारो श्रीभक्त या रोमांचकारी पालखी सोहळ्याला श्रींच्या दर्शनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात.

ही पालखी अष्टतीर्थांपैकी एक रुद्रपाद तीर्थापर्यंत वाजत-गाजत येते. या तीर्थांत श्रींच्या पादुकांना तीर्थस्नान असते. श्रीभक्तही या ठिकाणी आजच्या दिवशी या पवित्र तीर्थांत स्नान करून पुण्य मिळवतात. सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असली तरी अतिशय शांतपणे हा सोहळा संपन्न होतो.

या भारलेल्या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.


गाणगापूर येथील "भस्माचा डोंगर" या स्थळा बद्दलचा स्थान महिमा काय आहे?

भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाण द्वारे रचना तयार करायची सुधा एकपद्धत आहे.



॥श्री गुरुदेव दत्त॥






No comments:

Post a Comment